Tuesday, 24 November 2020

माझा वाढदिवस एक सोहळा

 नमस्कार  बावीस नोव्हेंबर तारीख माझा प्रकट दिन,म्हणजेच  वाढदिवस लॉक डाऊन मध्ये वाढदिवस घरीच साजरा केला.सर्व मित्र मैत्रिणी सहकार्‍यांनी शुभेच्छा संदेश  व फोन आवर्जून करून माझ्यावर  अभिनंदनाचा वर्षाव केला. 

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

लहानपणी फारसे आठवत नाही ,त्याकाळात वाढदिवस केक वगैरे  विशेष फॅड नव्हते, घरातल्या घरातल्या आवडीची पक्वान्ने बनवून करत असत .मला आठवतय मी पहिल्या  वर्गात होतो त्यावेळेस माझा वाढदिवस  साजरा केला होता.माझा  एक वर्ग मित्र जो घराच्या जवळ राहत  होता सकाळी घरी आला ,त्यावेळी आमचे औरंगाबाद ला खूप मोठे एकत्र कुटुंब होते,व त्याने मला हस्तांदोलन केले व शुभेच्छा दिल्या, त्याकाळी घरातील सर्वांना खुप आश्चर्याचा धक्का बसला, व कौतुक ही वाटले. मग लगेच आईने कांदा पोहे व शिरा केला त्याच्यासाठी, सर्व खाऊन 'तृप्त' झाल्यावर त्याने हाफ पँट मध्ये लपवलेला पार्ले बिस्कीट पुडा (मूल्य फक्त 10पैसे )सगळा तुला बरका..असे म्हणुन दिला होता. हा  मला आठवणारा माझा पहिला वाढदिवस.!!!!! नंतर आई ,आजी,आजोबा, काका आणि मावशी ,आत्या घरच्याघरी  करत असत, माझ्या आवडीची बटाटा भाजी, शिरा किंवा इडली सांबार असा माझा आवडीचा बेत असे . पण ह्याबरोबरच तू आता ईतक्या वर्षाचा...(----)झाला, असा धाक युक्त इशाराही मिळत  असे. एका  वाढदिवसाला मला तीनचाकी सायकल ही मिळाली होती ,वडिलांकडून ,पण त्याबरोबर रोज पाढे पाठ करणे, शुद्धलेखन ह्याचे वचन घेण्यास सगळेच विसरले नव्हते.  तसा पुढच्या पिढीतला पहिला त्यामुळे आजी लाड करायची .

वाढदिवस लक्षात ठेवून मला कायम  शुभेच्छा देणारी  एकमेव व्यक्ति म्हणजे मावसभाऊ प्रशांत खांबसवाडकर ,त्या काळी आंतरदेशीय पत्र मिळायचे 25 पैशाला  तो आठवणीने वाढदिवशी मिळेल असे पाठवतअसे,कधीही नेम चुकला  नाही, तो आज ही चालू आहे. आता पण रात्री 12 च्या आत  फोन येतोच!!!

नोकरीमध्ये असताना बरेच वाढदिवस साजरा केले गेले, माझे सहकारी,माझ्या विविध ठिकाणी असणार्‍या  टीम, व्यवसाय मित्र,आप्तेष्ट,वरीष्ठ  वगैरे  सगळ्यानी खूप प्रेमाने वाढदिवस साजरे केले.  गेल्या पंधरा वीस वर्षात जरा जास्तच जोरात साजरा होतो आधी  बायको आणि आता मुलीच्या उत्साहाने, माझा उत्सव मुर्ती दर वर्षी होतो. पूर्वी स्वतः साठी आता सर्वाना खुष करण्यासाठी!!!

आठ वर्षापुर्वी सगळे  बंधन सोडून  मी कॉर्पोरेट जगातील नौकरी ला रामराम केला होता. काहीतरी  स्वतः चे सुरू करण्याचा उद्देश. आणि 22 नोव्हेंबर 2013 ला कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये काम करायला सुरवात केली आता ह्यात  स्थिरावलो आहे. पण पुढे काय ? असा  प्रश्न पडतो  तेव्हा 

"देणार्‍याने देत रहावे...घेणार्‍या घेत रहावे घेता  घेता एक दिवस देणाऱ्या चे हात च घ्यावेत " ह्या नुसार माझ्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला  व्हावा  असे  वाटते..

लॉक डाऊन  मध्ये  एक चांगले पुस्तक  वाचनात आले,निलेश साठे सरांचे !"साठे  उत्तरांची  कहाणी" त्यांचीही माझ्याप्रमाणेच विमा क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द , फरक इतकाच की मी विमा क्षेत्रात खाजगीकरण झाल्यावर काम केले व ते आधीपासून अजूनही करत आहेत.

त्या वरुनच स्फूर्ती घेऊन संकल्प 

करतोय लिहिण्याचा, मला कल्पना आहे की हे शिवधनुष्य पेलणे सोपे नाही पण प्रयत्न करण्यास काही हरकत नाही .  माझ्या आयुष्यात मला भरभरून मिळाले व माझे जे काही प्राप्त अनुभवा च्या शाळेत शिकलेले अनुभवाचे भांडार आहे  ते मी काहीही राखून न ठेवता आतापर्यंत शक्य तेवढे  देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आज  जेव्हा मी  बॅंकिंग विमा  क्षेत्रात प्रशिक्षण  करतोय तेव्हा जी  'लढाई  पाहतोय तेव्हा कुठेतरी, भरकटलेल्या जहाजाच्या प्रमाणे  तरुण मंडळी  तणाव खाली कामे करताना दिसतात, फास्ट फूड,सारखे  लगेच  निकाल अपेक्षित आहेत ,सर्वांना जमतेच  असे व अपयशाने  ,बरीच युवा पिढी दूर जात आहे .हे पाहून  मन खिन्न  होते. 

 माझ्यावर प्रेम करणा र्‍या माझ्या अनेक सहकार्‍यांना मित्राना व  तरुण पिढीला माझ्या अनुभवाचा लाभ व्हावा असे वाटते.  व माझ्या काही जवळ च्या आप्तेष्टां च्या आग्रहाने लिहिण्याचा मानस करतोय..अभिप्राय व  सुचना नक्की सांगा कळवा म्हणजे पुढे  लिहायचे कसे हे ठरवता येईल 

आपला 

शिरीष शरद पाटील 

पुणे 

9890 333 611

श्री गणेशा लेखनाचा - शिरीष पाटील

 नमस्कार 

खूप दिवसांपासुन मनामधे एक गोष्ट पक्की केली होती ती म्हणजे मला माझ्या प्रोफेशनल जीवनामध्ये आलेले चांगले वाईट अनुभव शब्दात लिहुन काढणे, आत्मचरित्र  वगैरे लिहिण्यासाठी    मी  काही  खुप    मोठी   असामी नाही पण एक  सामान्य  नागरिक  आहे, लॉक डाऊन  सु रु झाल्यावर सगळ्यानाच सारखाच हुरूप आला होता बरेच काही नवनवीन करण्याचा , पण सुरुवात काही झाली नाही ,कारण घरात जरी होतो तरी मुहूर्त काही लागला नाही. मागच्या महिन्यात श्री. निलेश साठे सरांचे "साठे उत्तरांची कहाणी "हे पुस्तक मला मिळाले,तशी माझी सरांची ओळख नाही परंतु दोघेही एका क्षेत्रातील ते म्हणजे आयुर्विमा, गेल्या काही वर्षापासुन सोशल नेटवर्किंग साईटवर मी सरांचे लेख वाचत होतो,दूरदर्शन वर मुलाखत पाहिली होती, व ते एलआयसी मधील खूप वरीष्ठ पदावरील अधिकारी ,असल्यामुळे बरेच ऐकले होते, त्यामुळे सरांची तशी "थेट नाही पण नेट " ओळख झाली होती ,मग त्यांच्या पुस्तकाविषयी माहिती मिळाली पण मला लॉक डाऊन मध्ये बाजारात जाऊन पुस्तक आणणे शक्य नव्हते, असे मी सरांना सांगितले त्यांनी लगेच पत्ता पाठवा मी पाठवण्याची व्यवस्था करतो असे सांगितले, तीन दिवसांनी घराची बेल वाजली,दारात पोस्टमन काका उभे, मला वाटले ते दिवाळी मागायला आले असावेत कारण त्यांची भेट फक्त दिवाळी ते दिवाळीलाच होते ,पण दिवाळीला अजूनही पंधरा दिवस होते, त्यांनी एक छान नमस्कार अदबीने केला ,शक्य तेवढे स्मित हास्य केले व माझ्या मनातली शंका दूर केली, पाटीलसाहेब नागपूरहून रजिस्टर पोस्टाने पार्सल आहे ,हा घ्या पेन आणि सही करून ताब्यात घ्या ,व माझ्या तब्येतीची विचारपूस केली., दिवाळीत येतो परत असे आवर्जून सांगितले !!!!...तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ,ह्यावर्षी चांगली दिवाळी मिळावी ह्यासाठी पूर्वतयारी..सूचना, व हास्य अदबीनं वागणे हे सरकारी नोकरीत जरी वर्ज्य असावे(माझा समज आहे)तरी चांगली पोस्ट  (दिवाळी ) मिळावी म्हणुन केलेली गुंतवणूक असावी . पार्सल उघडले तर मला आश्चर्याचा धक्का जे पुस्तक वाचण्याची मी इच्छा व्यक्त केली होती त्याची चक्क नवी कोरी प्रत माझ्या हातात!!! माझा विश्वासच बसत नव्हता, कारण माझ्या एका छोट्या सूचनेवरून सरांनी मला पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली. मी लगेच धन्यवाद मानले ,सरांनी मला वाचून अभिप्राय व काही त्रुटी उणीवा असतील सूचना करावी असे नम्रता पूर्वक सांगितले . (ह्याला मोठ्यांच्या छोट्या गोष्टी म्हणतात)
सध्या वाचन हे हातातल्या मोबाईल वर होते हे जवळ जवळ सगळ्यानाच लागु पडते , तेही इंग्रजी च जास्त,पूर्वी पुस्तके आणून वाचायचो, पण आता एवढे मोठे पुस्तक आणुन वाचण्याचा कंटाळा येतो, माझा मराठी वाचण्याची संबंध बारावी परीक्षेच्या नंतर फक्त सकाळी घरी येणारा पेपर वाचणे एवढाच राहिला आहे लॉक डाऊन मध्ये तो ही संपला ,कारण विमा व गुंतवणूक क्षेत्रात काम करताना इंटरनेट वर जास्त माहिती ही इंग्रजीत मिळते, त्यामुळे असावा कदाचित, खरतर मी मुंबईत शाळा कॉलेजात शिकलेलो, त्यामुळे मराठी पिंड व अभिमान आपोआप आलेला आहे, बाळासाहेबांची भाषणे विचार ऐकून तरुणपणी एक उत्साह येत असे,अजून ही त्यांची भाषणे ऐकली की खूप स्फुरण चढते अंगातले रक्त सळसळते त्यांचा करिष्मा काही निराळाच !
एवढे सगळे सांगायचा उद्देश असा की कॉर्पोरेट जगातील इंग्रजाळलेल्या मी पुस्तक तीन दिवसात (घरातील कामे सांभाळुन )वाचून काढले. पुस्तक वाचताना असे जाणवले की माझा जीवनप्रवास ह्याच्याशी मिळता जुळता आहे, व साम्य आहे.
ह्यातील अनुभवकथन हे जसे घडले तसेच मांडले आहे त्यामुळे वाचणार्‍यांच्या मनाला ते सगळे भिडते. मी सरांना अभिप्राय कळवले व माझ्या मनातील लिखाण करण्याचा मानस बोलून दाखवला ,त्यांनी लगेच लिहिते व्हा असा संदेश दिला.
मी संकल्प केलाय माझ्या वाढदिवशी 22 तारखेला , माझे बरे वाईट अनुभव लिहिण्याचा,त्याप्रमाणे तीन कालखंड मध्ये विभागणी करतोय.
1 ) माझे बालपण ते शैक्षणिक जीवन 
2)माझे करियर घडले ती कन्झ्युमर /सेवा उत्पादन (Fmcg) इंडस्ट्री जिथे मी माझ्या सेल्स करियर सुरुवात केली व वितरण Distribution मॅनेजमेंट अन संघ व्यवस्थापन(Team mgt) शिकलो हा एक 11 वर्षाचा अविस्मरणीय प्रवास...आणि
3) माझा विमा क्षेत्रात काम करताना अनुभवलेले गेल्या 12 /15 वर्षातले अविस्मरणीय दिवस , त्यात जोडलेली जीवापाड प्रेम करणारी माणसे.

काल पाठवलेला लेख खुप जणांना आवडला, आणि वायरल झाला  माझ्या कॉलेज मित्राने नाव वाचून ओळखले व संपर्कही केला, अभिप्राय दिला व 30 वर्षानी आम्ही प्रथम बोललो...अजुन आनंदी होण्यासाठी काय पाहिजे ? त्यामुळे आता निर्धार पक्का!!! रोज मनातले नोटपॅड वर करणार!!!
भेटूच...आणि हो अभिप्राय द्यायचा बर का नक्की !!!
आपला
शिरीष शरद पाटील
WA:9890 333 611
M:shirishp2211@gmail.com
T:@shirishkeya
FB:#salestipsbyshirish
#sellingideasbyshirish
@shirishkeya